काही दिवसांपूर्वी Eight below नावाचा एक सुंदर चित्रपट बघण्यात आला,त्या चित्रपटातील माणूस आणि कुत्र्यांचे एकमेकांशी निर्माण झालेले नाते पाहून कुत्रा पाळण्याची माझी इतके दिवस दबून राहीलेली माझी उर्मी पुन्हा एकवार उफाळून आली.त्याचवेळी डोक्यात चक्र सुरु झाले कि माणूस आणि कुत्रा हे कधीपासून एकत्र आले असतील आणि कुत्रा तर लांडग्याच्याच कुळातला प्राणी मग माणसाने त्याला कसे माणसाळवले असेल? मग माझ्या अनुजा बोस नावाच्या archaeologist मैत्रिणीशी या विषयावर चर्चा केली. तिने या विषयावरची बरीच माहिती पुरवली आणि माझा उत्साह वाढीला लागून मी या विषयावरची अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली.
माणसाळलेल्या कुत्र्याचे सर्वात जुने अवशेष बेल्जियममधील Goyet गुहेत सापडले आहेत, या गुहेत सापडलेली कुत्र्याची कवटी साधारणता २६००० ते ३६००० हजार वर्षे जुनी आहे. पूर्व पुराश्मयुगातील (Upper Paleolithic period) युरोपमधील Aurignacian मानवाने हा कुत्रा पाळला असावा. मानवाने त्याआधी कधीतरी लांडग्याची (Canis lupus) शिकार करून त्याची पिल्ले पाळली असावीत आणि काही पिढयांनंतर त्यातूनच आजचे कुत्रे (Canis lupus familaris) निर्माण झाले असावेत असा काही संशोधकांचा अंदाज आहे अर्थातच त्याला छेद देणारे सिद्धांतही मांडले गेलेले आहेत.
पाळीव कुत्र्यांच्या अस्तित्वाचा अजून एक पुरावा मिळतो तो फ्रान्समधील Chauvet गुहेत. या गुहेत आदिमानवाने चितारलेली अत्यंत सुरेख चित्रे आहेत त्याशिवाय या गुहेत साधारणत: ८ वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत चालणारा कुत्रा यांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. हे ठसे सुमारे २६००० वर्षापूर्वीचे आहेत.
भारतीय उपखंडातील कुत्र्यांचा विचार केला असता हे कुत्रे येथेच उपजले असून सुमारे १५००० वर्षांपासून ते भारतीय उपखंडात वास्तव्य करत आहेत,जगातील सर्वात जुन्या कुत्र्यात भारतीय कुत्र्यांचा समावेश होतो.ऑस्ट्रेलियात आढळणारे Dingo (Canis lupus dingo) हा सुद्धा साधारणपणे भारतीय कुत्र्यांसारखाच आहे.भारतातील कुत्र्यांचा सर्वात पहिला पुरावा मध्याश्मयुगातील (Mesolothic period) भीमबेटका गुहात काढल्या गेलेल्या चित्रात आढळतो. सुमारे १०,००० वर्षांपूर्वी काढल्या गेलेल्या या चित्रात एक कुत्रा माणसाच्या मागोमाग चालताना दिसतो. त्याच्या गळ्यात बांधलेली दोरी माणसाच्या हातात आहे यावरून तो कुत्रा पाळीव आहे हे निश्चित.काश्मीरमधील बुर्झोम येथील उत्खननात माणसाबरोबर दफन केलेले पाच कुत्रे आढळले आहेत यावरून ३००० वर्षांपूर्वी कुत्रा हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनल्याचे दिसून येते.
भीमबेटकामधील कुत्र्याचे चित्रबुर्झोममधील शिलाचित्रबुर्झोम येथील दफन केलेला कुत्रा
ताम्रपाषाण युगात (Chalcolithic age) म्हणजेच सिंधू संस्कृतीतील महत्वाच्या स्थळांपैकी लोथल,मोहन्जोदारो व हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात काही मातीच्या (Terracota) खापरांवर कुत्र्याचे चित्रण केलेले आढळले आहे. हा कुत्रा गळ्यात दोरी बांधून एका खांबाला बांधलेला आहे यावरून राखण करण्यासाठी किंवा संरक्षणासाठी कुत्र्यांचा वापर केला जात असावा. तोंडात ससा पकडलेल्या कुत्र्याचे मातीचे (Terracota) एक खेळणेही हडप्पा येथे सापडले आहे यावरून कुत्र्यांचा शिकारीसाठीही उपयोग केला जात असावा असा अंदाज बांधता येतो. याशिवाय गेंड्याचे शरीर व कुत्र्याचे तोंड असलेल्या काही मातीच्या मूर्ती आढळल्या आहेत यावरून त्यांचा काही धार्मिक कार्यासाठी/विधीसाठी वापर होत असेल का अशीही शंका मनात येते. हरियाणा येथील राखीगढी येथे उत्खननात एक छोटीशी कुत्र्याची मूर्ती सापडली आहे तिच्या गळ्यात पट्टाही दिसतो यावरून सिंधू संस्कृतीत कुत्रा हा पूर्णता पाळीव झालेला होता असा अंदाज बांधता येतो.
सिंधू संस्कृती इतकाच पुरातन असा एक पुरावा महाराष्ट्रातही आढळला आहे,१९७४ साली नगर जिल्ह्यात दायमाबाद येथे तांब्यांच्या वस्तूंचा एक संच (Copper hoard) उत्खननात सापडला.यात चाके असणारे हत्ती,म्हैस व गेंडा हे प्राणी असून दोन बैलासोबत असणारी एक बैलगाडीही सापडली आहे. यातील बैलगाडीवर गाडीवानासोबत एक कुत्राही उभा आहे. यावरून त्याकाळात मानवासोबतचे त्याचे नाते अगदी घट्ट झालेले दिसते.
इतिहासपूर्व काळातील कुत्रा आणि मानवाच्या संबंधांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण भारतीय कला,साहित्य आणि संस्कृतीमध्ये कुत्रा कुठे कुठे दिसतो याचा आढावा घेऊया.
ऋग्वेदातील १० व्या मंडलात इंद्राला मदत करण्यासाठी ‘पणि’ म्हणजेच असुरांनी चोरून नेलेल्या गाईंचा माग काढण्यासाठी गेलेल्या देवांची कुत्री ‘सरमा’ हिची कथा आहे. पृथ्वीवरील कुत्रे हे या सरमाचे वंशज म्हणून त्यांना ‘सारमेय’ असे संस्कृतमध्ये संबोधले जाते.
बौद्ध साहित्य म्हणजे जातक कथा यात बुद्धाच्या म्हणजेच बोधीसत्वाच्या अनेक कथा येतात. जातक कथात वेळोवेळी कथांची भर पडत गेली.यातीलच एक कथा आहे “कुक्कुर जातक”.यामध्ये बोधिसत्व हा कुत्र्याच्या रुपात जन्म घेऊन वाराणसीच्या राजाला उपदेश करतो असा कथाभाग येतो.ही कथा अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच इसपू ५ व्या शतकाच्या आसपास रचली गेली असावी असा अंदाज आहे. या कथेत राजाने आपल्या राजवाड्यात कुत्रे पाळलेले होते असाही संदर्भ येतो.
पाणिनीच्या अष्टाधायी या इसपू ४थ्या शतकातल्या ग्रंथात पाणिनी पाळीव कुत्र्यांचा उल्लेख ‘श्वा’ असा करतो आणि राजाने पाळलेल्या/पैदास करवलेल्या कुत्र्यांना ‘कौलेयक’ असे संबोधतो. ‘श्वा-गणिक’ म्हणजे पाळीव शिकारी कुत्र्यांची टोळी (Pack of hounds) असाही उल्लेख पाणिनीने केलेला आहे.
इसपू ३ऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात त्याने राजाने सरकारी कुरणे म्हणजेच जिथे जनावरे चरायला सोडली जातात तिथे हिंस्त्र प्राणी येऊन त्यांनी या पाळीव जनावरांना इजा पोहोचवू नये म्हणून ‘स्व-गणिन’ म्हणजे शिकारी कुत्रे (Pack of hounds) पाळून पाळीव प्राण्यांचे रक्षण करावे असा उपदेश केलेला आहे.
सांचीच्या स्तूपाच्या तोरणावर काही बौद्ध कथा आणि जातके कोरली आहेत.यातील एका कथेत सर्व प्राणी बोधीवृक्षाकडे भक्तिभावाने पाहत आहेत असे एक शिल्प आहे त्यात दोन कुत्रेही दर्शवले आहेत. हे दर्शवताना त्यांचे तोंड कुत्र्याचे व शरीर सिंहाचे असे दर्शवले आहे. या शिल्पाचा काळ संशोधकांनी इसपू २ रे शतक असा निश्चित केलेला आहे.
इसपू २ ऱ्या/ १ ल्या शतकात म्हणजेच मौर्य किंवा शुंग काळातील एक मृण्मुद्रा (Terracota plaque) पश्चिम बंगालमध्ये चन्द्रकेतूगड येथे सापडली आहे. यावर एका उंच आसनावर बसलेले दंपती दाखवले असून त्यांच्या पायाशी एक लहान मुलगाही दिसतो. हा लहान मुलगा गळ्यात दोरी बांधलेल्या एका कुत्र्याशी खेळताना दिसतो. शिवाय तिथेच बदकासारखा दिसणारा पक्षीही दिसतो. यावरून कुत्रा ज्याच्याशी लहान मुलांनीही खेळावे असा पूर्णतः पाळीव झालेला दिसतो. याशिवाय पाळीव पक्ष्यांची शिकार करायची नाही हे शिक्षणही त्याला मिळालेले दिसते.
अजिंठा येथील जगप्रसिद्ध बौद्ध गुहातील चित्रात तत्कालीन समाजजीवनाचे चित्रण दिसून येते. गुहा क्र. १७ मध्ये सुतसोम जातक ही कथा चित्रित करण्यात आलेली आहे. वाराणसीचा राजा सुदास हा वनात शिकारीसाठी जाताना दिसतो. यावेळी त्याच्या बरोबर अनेक लोक तसेच हत्ती घोडेही दिसतात. पण याचबरोबर काही सेवक शिकारी कुत्र्यांना (Hounds) बांधलेल्या दोऱ्या खेचून त्यांना आवरताना दिसतात. बारकाईने निरीक्षण केले असता यातील कुत्रे वेगवेगळ्या जातींचे आहेत हे सुद्धा दिसून येते. हे चित्र वाकाटकांचा मांडलिक असणाऱ्या उपेन्द्र्गुप्त याने दान केलेल्या गुहेतील आहे व याचा निर्मितीचा काळ इस ५ वे शतक आहे.
भारतीय दैवतानाही आपण वेगवेगळ्या प्राण्यांशी जोडलेले आहे जसे कि वृषभ म्हणजे शिव, मोर म्हणजे कार्तिकेय शिवाय याच प्राण्यांना आपण त्या त्या दैवताचे वाहनही मानलेले आहे. काही ठिकाणी दैवताच्या मूर्तीसोबत काही प्राण्यांचे अंकन करण्याची पद्धत ही दिसून येते. जसे की शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतात जसे व्याखानमूर्ती, सोमास्कंद इ. याशिवाय शिवाची भिक्षाटन मुर्तीही अतिशय प्रसिद्ध आहे. यात भिक्षा मागणारा शिव दाखवलेला असतो व त्याच्यासोबत एक कुत्राही नेहमी दाखवलेला असतो.
शिवाचेच रूप असणारा भैरव हा देखील नेहमीच कुत्र्यासोबत दाखवला जातो. बरेचदा भैरवाच्या हातातील मानवी मस्तकातून ठिबकणारे रक्त खाणारा कुत्राही दाखवला जातो.वाराणसी येथील भैरवाच्या मंदिरातील मूर्तीच्या दोन्ही बाजूस त्याचे रक्षक म्हणून बसलेले कुत्रे आहेत. भैरवाच्या पाठीमागे उभा असणारा व संतापाने गुरगुरणारा कुत्राही अनेक शिल्पात दाखवला आहे.
इस ७व्या/८व्या शतकाच्या आसपास रचून पूर्ण झालेल्या आजच्या महाभारतातील महाप्रास्थानिक पर्वात ज्यावेळी पांडव व द्रौपदी जेंव्हा स्वर्गाकडे जाण्यास निघतात त्यावेळी कुत्र्याच्या रूपाने यमधर्मही त्यांच्यासोबत असतो.स्वर्गाच्या दारावर जेंव्हा रक्षक युधिष्ठिराला कुत्र्याला बाहेरच सोडून स्वर्गात प्रवेश करायला सांगतात त्यावेळी कुत्र्याला सोडून युधिष्ठिर स्वर्गात प्रवेश करण्यास नकार देतो असा एक कथाभाग महाभारतात येतो .
ओरिसामधील हिरापूर येथे इस ९व्या शतकातील ६४ योगिनींचे एक मंदिर आहे. हे मंदिर तंत्रमार्गी साधनेसाठी बांधण्यात आलेले असावे. या मंदिरात योगिनींच्या ६४ मूर्ती स्थापित केलेल्या आहेत.यापैकीच एक मूर्ती ‘विक्राळी’ या योगिनीची आहे जी कुत्र्यावर आरूढ आहे. यातून तंत्रमार्गी साधनेतही कुत्र्याने स्थान मिळवले होते हे स्पष्ट होते.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या अश्वारूढ मूर्तीच्या पायाशीसुद्धा कुत्रा दाखवलेला असतो. खंडोबा हा शिवाशी साधर्म्य असणारा देव असल्याने किंवा शिवापासूनच उत्पन्न झालेला असल्याने त्याच्यासोबतही भैरवाप्रमाणे कुत्रा दर्शवण्यात आला असावा.
महाराष्ट्रातीलच सर्वात नवीन संप्रदाय म्हणून उदयास आलेल्या दत्तासोबतही कुत्रा दाखवलेला असतो.
भटका आदीमानव,गुरे पाळणारा व शेती करणारा आदीमानव ते नगरे वसवून त्यात वास्तव्य करणारा आधुनिक मानव या सर्व स्थित्यंतराचा साक्षीदार ,त्याला शिकारीत मदत करणाऱ्या, त्याच्या घराचे कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या या इमानी साथीदाराच्या माणसासोबतच्या वाटचालीचे स्मरण ठेवण्यासाठी हा लेखन प्रपंच
आपले लेख हे अभ्यासपूर्ण व मुद्देसूद असतात।खूपच छान लिहिता तुम्ही
LikeLike
मस्त लेख.
LikeLiked by 1 person